लॉकडाउनच्या काळात रेशन कार्ड धारकांना सरकारी स्वस्त धान्य दुकानांमधून अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र शिधापत्रिकेवर अन्नधान्याची उचल न केलेले नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख नागरिक आहेत. त्यांना सद्याच्या परिस्थितीत अन्नधान्य देण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय नागपूर शहरात शेजारील राज्यातून व आजुबाजूच्या खेड्यांमधून उदरनिर्वाहासाठी येणा-या गोरगरीब मजुरांना व असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही अन्नधान्याचा पुरवठा होत नाही आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने तत्काळ प्रभावाने सर्व त्रुट्या दूर करून त्वरित सर्वांना अन्नधान्य पुरवठा करावा, अशी मागणी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यासंदर्भात त्यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन दिले.